कामथे परिसरात महामार्गाशेजारील 'ट्री गार्ड'ची चोरी
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कामथे परिसरात लागवड केलेल्या वृक्षरोपांच्या भोवती असलेले लोखंडी ट्री गार्ड अज्ञातांनी चोरल्याची बाब उघड झाली असून या संदर्भात महामार्ग ठेकेदार कंपनीचे सुपरवायजर व पर्यावरणप्रेमींनी चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी शहरातील भंगार व्यावसायिकांना या चोरीसंदर्भात कल्पना देऊन ट्री गार्डचे लोखंडी भंगार घेऊ नका, अशी सूचना केली आहे. महामार्गावर परशुराम ते आरवली यादरम्यान वृक्ष संवर्धन समिती व निसर्गप्रेमींच्या इशाऱ्यानंतर स्थानिक व देशी प्रजातींची रोपे लावण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. रोपे मोठी होईपर्यंत त्याला लोखंडी संरक्षित जाळ्या (ट्री गार्ड) लावल्या जात आहेत. मात्र, काही विघ्नसंतोषींनी कामथे परिसरात वृक्ष लागवड केलेल्या २० ते २५ रोपांभोवतीचे गार्ड चोरून नेल्याची बाब निदर्शनास आली आहे. याबाबत वृक्ष संवर्धन समितीसह निसर्गप्रेमींकडून संतप्त भावना व्यक्त झाल्या आहेत तर तातडीने याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. तक्रार दिल्यानंतर पोलिस निरीक्षक शिंदे यांनी शहरातील सर्व भंगार व्यावसायिकांना त्वरित सूचना देऊन कुणी व्यक्ती लोखंडी जाळ्या घेऊन आल्यास त्या स्वीकारू नयेत. तसेच पोलिस ठाण्यात तातडीने संपर्क करावा, असे सांगून भंगार व्यावसायिकांना सक्त सूचना दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 12-08-2024
What's Your Reaction?