Ratnagiri : नव्या गणवेशासाठी अजून काही दिवसांची प्रतीक्षा...
रत्नागिरी : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी उलटला आहे. जुन्या गणवेशावरच नवीन शैक्षणिक वर्षे विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे. अजून काही दिवस गणवेशासाठी विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार आहे. एका गणवेशाचे कापड तालुकास्तरावर वितरीत झाले आहे. तर शासनाकडून मिळणारे गणवेशाचे तर तीन-तेरा वाजले आहेत. फक्त रत्नागिरी तालुक्यालाच गणवेश मिळाला आहे. उर्वरित ८ तालुक्यांना मात्र गणवेशाचा पत्ताच नाही.
शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत गणवेश या शासनाच्या धोरणाला बंदा खो बसला आहे. शाळा सुरु झाली पण जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ७० हजार चिमुकल्यांना गणवेशाविनाच यावे लागले आहे. राज्य शासनाने यावर्षीपासून 'एक राज्य एक गणवेश' योजना राबवण्याचा निर्णय घेतला खरा, पण सध्या या योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. समग्र शिक्षा अंतर्गत या शैक्षणिक वर्षात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात शिक्षाग घेत असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जाणार आहे. शासनाने १० जूनला या योजनेच्या अंमलबजावणीचाबत नवीन अध्यादेश काढला, हा अध्यादेश संभ्रमात टाकणारा होता. जुन्या निर्णयानुसार दोन गणवेशासाठी शासन कापड देणार होते आणि महिला बचतगटाकडून हे गणवेश शिजून घ्यायचे होते.
आता मात्र नव्या आदेशात गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे. शाळा १५ जूनला सुरू झाल्या. गणवेश शिलाईचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, दुसरा गणवेश (स्काऊट गाईड) चे कापड शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात यावे. या गणवेशासाठी शिलाईसाठी रुपये १०० प्रती गणवेश व अनुषांगिक खर्च १० असे एका गणवेशासाठी ११० रुपये प्रती विद्यार्थी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण मुंबई यांनी वर्ग करावी, असे अध्यादेशात म्हटले होते. या अध्यादेशानुसार १८ जूनला स्पष्ट झाले होते. स्काऊट गाईड गणवेशासाठी कापड तालुक्याला प्राप्त झाले होते. आता हे कापड शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतर त्याची शिलाई सुरु होणार आहे. यामुळे कमीत कमी दोन महिने कालावधी लागू शकतो. यामुळे दुसऱ्या सत्रातच गणवेश मिळण्याची शक्यता आहे. दुसरा गणवेश मात्र कधी येणार ? हे मात्र संभ्रमात टाकणारे आहे. हा गणवेश शासन पुरवणार असल्याने या आदेशात म्हटले आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात चौकशी केली असता फक्त रत्नागिरी तालुक्यासाठी गणवेशाचे कापड आले होते. त्यापैकी १० हजार विद्यार्थ्यांचे गणवेश शिवून पूर्ण झाले. त्याचे वितरण सुद्धा करण्याचे काम सुरु आहे, असे सांगितले गेले आहे. यामुळे उर्वरीत तालुक्यांचा मात्र प्रश्न उपस्थित होणार आहे. या तालुक्यांना गणवेश कापडाचा अद्याप पत्ताच नाही. यामुळे ८ तालुक्यांना कापड कधी येणार ? आणि गणवेश कधी शिवून येणार, हे संभ्रमात टाकणारे आहे.
बूट व मोज्यांसाठी निधी प्राप्त
बूट व मोज्यांसाठी जि. प. ला निधी प्राप्त झाला आहे. एकूण ७० हजार ५५१ विद्यार्थ्यांसाठी १ कोटी १९ लाख ९३ हजार रुपये प्राप्त झाले आहे. हा निधी शाळास्तरावर वितरीत करण्याचे काम सुरु आहे. दोन दिवसांत प्रत्येक शाळेला हा निधी मिळेल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:49 PM 11/Jul/2024
What's Your Reaction?