देशातील 22 UPSC चे आधिकारी बोगस? RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा खळबळजनक दावा

Aug 16, 2024 - 16:25
 0
देशातील 22 UPSC चे आधिकारी बोगस? RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा खळबळजनक दावा

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वतोमुखी चर्चेचा विषय झालेल्या पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) प्रकरणानंतर असाच काहीसा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. देशातील एकूण 22 UPSC चे आधिकारी बोगस (Bogus IAS) असल्याचा दावा RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.

एवढेच नाही तर या 22 अधिकाऱ्यांची नावे असणारी एक डॉक्युमेंट UPSC FILES नावाने सोशल मीडियावर फिरत असून ती यादी देखिल विजय कुंभार यांनी समोर आणली आहे.

याबाबत UPSC आयोगाला पत्र लिहून, या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, या अधिकार्यांना ज्यांनी मदत केली त्यांची देखील चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विजय कुंभार यांनी केली आहे. या 22 मधील पुणे शहरातील एक अधिकारी असून राज्यातील देखील एकूण चार अधिकारी असल्याचा दावा केला जातोय. इतकच नाही तर हे सर्व आधिकारी राज्यात IAS, IPS आणि IRS म्हणून कार्यरत असल्याचेही विजय कुंभार यांनी सांगितलंय.

यूपीएससीतील गैरप्रकार म्हणजे देशाविरुद्ध एकप्रकारे युद्धच
मध्यंतरी पूजा खेडकर यांचे उघडकीस आलेल्या प्रकरणानंतर अशाच प्रकारचे काही प्रकरण उजेडात आले आहेत. अनेकांनी त्याबाबत तक्रार देखील दिल्या आहेत. त्यातील काही नाव सोशल मीडियामध्ये देखील पुढे आलेली आहे. त्यातीलच एक फाईल म्हणजे यूपीएससी फाईल ही आहे. त्यात एकूण 22 यूपीएससीच्या अधिकाऱ्यांची नावे आहे. ज्यामध्ये या कथित अधिकाऱ्यांनी खोटी जात प्रमाणपत्र, खोटे उत्पन्नाचे दाखले, किंवा बनावट उत्पन्नाचे दाखले, बनावट डिसेबिलिटी सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे दाखल करून त्यांनी नोकरी मिळवली आहे.

या संदर्भामध्ये मी संबंधित अधिकाऱ्यांची माहिती घेतली असता या संदर्भात संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे. यातील चौकशी करून दोशींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मी पत्राद्वारे केली असल्याची माहिती ही विजय कुंभार यांनी दिली आहे.

हे प्रकरण पाहता देशाविरुद्ध एकप्रकारे युद्ध सुरू असल्याची एकंदरीत परिस्थिती आहे. कारण आयएएस ही देशातील सर्वोच्च परीक्षा असून सर्वात सुरक्षित अशी परीक्षा मानली जाते. इथून निवडून येणारे अथवा इथून परीक्षा पास करून येणारे अधिकारी देशातील एका महत्त्वाचे पद भूषवतात आणि अनेक निर्णय घेतात. त्यामुळे अशा परीक्षांमध्ये कुठल्याही उणीवांना स्थान नाही. त्यामुळे संबंधित प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता आशांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ही आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.

चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
अलीकडे उघडकीस येणारे गैरप्रकार लक्षात घेता या सर्व प्रकाराचा फटका प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसतो आहे. या संपूर्ण प्रकारात काही प्रकरण असे देखील आहे की त्यांनी दिव्यांग असल्याचे बनावट सर्टिफिकेट जमा केले आहे आणि त्यानंतर त्यांचेच काही व्हिडिओ समाज माध्यमांवर नाचताना दिसले आहेत. इतका गंभीर प्रकार हा अद्याप कुणाच्याही लक्षात आला नाही, असं म्हणता येणार नाही. तर हे प्रकरण काहींच्या लक्षात आले असून देखील त्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्या असल्याचं पण बोलायला जागा आहे.

यात अनेक पदांची अशाच प्रकारे निवड झाल्याचेही विजय कुंभार म्हणाले. एकट्या महाराष्ट्रात अशा प्रकारची चार प्रकरण उजेडात आली आहे. ही लोक राज्यात काम करत नसली तरी ते राज्याबाहेर काम करत आहेत. त्यामुळे यूपीएससीने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता यात हस्तक्षेप करून वेळीच यावर कारवाई करून योग्य ते पाऊल उचलावे, असे आवाहन ही त्यांनी केले आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:53 PM 16/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow