बांगलादेशात जे झालं त्याचे पडसाद राज्यात उमटण्याचे कुठलेही कारण नाही : शरद पवार

Aug 17, 2024 - 13:56
 0
बांगलादेशात जे झालं त्याचे पडसाद राज्यात उमटण्याचे कुठलेही कारण नाही : शरद पवार

मुंबई : मधल्या काळात बांगलादेशात जी घटना घडली त्याचे काही पडसाद देशातील काही भागात उमटताना दिसलेत. दुर्दैवानं त्याची प्रचिती महाराष्ट्रातही काही ठिकाणी आली. मात्र बांगलादेशात (Bangladesh Violance) जे घडलं त्याचे परिणाम महाराष्ट्रात होतील असं कधी वाटलं नव्हतं.

त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण अशा परिस्थितीमध्ये समाजातील सर्व स्तरांमध्ये एकवाक्यता आणि संयम राहणे याची अतिशय गरज आहे. एकंदरीत महाराष्ट्रात काही ठिकाणी जे घडलं ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचं नाही. असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यात घडत असलेल्या घटनेबद्दल आपले मत व्यक्त करत नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. ते नागपूर येथे आले असता समाज माध्यमांशी ते बोलत होते.

समाजाने एकवाक्यता आणि सामंजस्य राखावं
आज राज्यात शांततेची नितांत गरज आहे. राज्यात आणि देशात शांतता प्रस्थापित करायची असेल तर सामाजिक आणि राजकीय स्तरावर संयमाचा पुरस्कार करावा. तसेच राज्यात शांतता कशी प्रस्थापित होईल याची खबरदारी राज्यकर्त्यांनी घ्यावी. किंबहुना बांगलादेशात जे झालं त्याचे पडसाद राज्यात उमटण्याचे कुठलेही कारण नाही. समाजाने एकवाक्यता आणि सामंजस्य राखावं, असे आवाहन मी या निमित्ताने करतो. असेही शरद पवार म्हणाले.

समाज आणि ही मला जास्त महत्त्वाची
या संबंधित प्रकारात गृहमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन यावर लक्ष घालावं. किंबहुना गृहखात्याच्या जबाबदारी विषयी भाष्य करता येईल. मात्र समाज आणि समाजातील शांतता ही मला जास्त महत्त्वाची वाटते. त्यामुळे त्या अनुषंगाने अन्य बाबींवर मी भाष्य करणार नाही. परंतु बांगलादेशमध्ये घडत असलेली घटना आणि त्याचे पडसाद राज्यात उमटणे हे समाजाच्या हिताचे नाही. जे या प्रकरणात सहभागी होत असतील त्यांना माझे आवाहन राहील की, अन्य देशात झालेल्या गोष्टींमुळे आपण आपल्या देशात सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत होईल असे कुठलेही कृत्य करता कामा नये. असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे.

4 राज्यांत एकत्र निवडणुका घेऊन दाखवा - शरद पवार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र दिनाच्या औचित्याने दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भाषण करत देशाला संबोधित केलं. यावेळी बोलतांना त्यांनी देशात वन नेशन, वन इलेक्शन असेल, अशी घोषणा केली होती. मात्र काल केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर केलीय. हे सरकार देशात अद्याप चार राज्यात एकत्र निवडणुका घेऊ शकत नाही. देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठलेही सत्य उरले नाही. त्यांनी म्हटल्या प्रमाणे 4 राज्यांत एकत्र निवडणुका घेऊन दाखवा, असे थेट आव्हान शरद पवार यांनी सरकारला केलं आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 17/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow