व्यापाऱ्यांनो, कुणी दादागिरी केली तर ११२ ला कॉल करा : धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी

Aug 23, 2024 - 16:58
Aug 23, 2024 - 17:30
 0
व्यापाऱ्यांनो, कुणी दादागिरी केली तर ११२ ला कॉल करा : धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी

रत्नागिरी : बदलापूर शहरातील एका शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टाने सदर बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नसून जे लोक बंद पुकारतील त्यांच्याविरोधात कारवाई करा, असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. मात्र तरीदेखील काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी थेट व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दादागिरी करीत उद्या बाजारपेठ बंद ठेवायची असे सांगत आहेत. 

याबाबत आज रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेण्यात आली व त्यांच्या कानावर हि गोष्ट घालण्यात आली. उद्याचा बंद हा बेकायदेशीर असून याबाबत उच्च न्यायालयाने देखील सांगितले आहे. कोणताही राजकीय पक्ष बंद पुकारू शकत नाही. उद्या बाजारपेठा बंद ठेवण्याबाबत कुणी जबरदस्ती करीत असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले आहे. 

पुरेशी सुरक्षा व्यवस्था देखील यासाठी ठेवण्यात आली असून सबंधित राजकीय पुढाऱ्यांना नोटीसा देखील काढण्यात आल्याची माहिती धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. जर अशी कुणी दादागिरी करीत असेल तर ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:28 23-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow