खेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहातील प्रवेश २ वर्षे बंद
चिपळूण : शहराजवळील खेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांची शासकीय वसतिगृहाची गेल्या दोन वर्षांपासून प्रवेशप्रक्रिया बंद आहे. त्यामुळे गरजू मागासवर्गीय मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि वसतिगृहातील प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.
चिपळूण दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेत त्यांनी या वसतिगृहातील समस्या, अडचणी याबाबतची व्यथा मांडली. माजी विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना निवेदनाद्वारे माहिती दिली, वसतिगृहाचे गृहपाल, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त आणि समाजकल्याण अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे तसेच अर्ज विनंती करून ही बाब निदर्शनास आणून दिली होती, तरीही तेथील अधिकारी व कर्मचारी यांनी ठोस पावले उचलली नाहीत. प्रसंगी गरजू पालक आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरले.
चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे अनेक शाळा, महाविद्यालये तसेच व्यावसायिक शिक्षणसंस्था आहेत. त्यामुळे येथे बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या मागासवर्गीय गरजू विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी शासन विविध योजना राबवत असते; परंतु अशा अकार्यक्षम अधिकारी व प्रशासनाकडून तळागाळातील विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही.
२१ ऑगस्ट २०१९ ला रत्नागिरी येथील समाजकल्याण कार्यालयाबाहेर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी इमारतीसाठी आंदोलन केले होते. त्या वेळी प्रादेशिक उपायुक्तांनी रत्नागिरी येथे आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन दिले. या आंदोलनाला बराच कालावधी होऊन गेला तरीही इमारतीचा व इतर प्रश्न सुटलेले नाहीत. याउलट वसतिगृह प्रवेश बंद केले आहेत.
या वेळी माजी विद्यार्थी संकेत वाघमारे, विकास कदम, सुशांत मोरे, अजय मोहिते, साहिल सावंत, सामाजिक कार्यकर्ते विनोद कदम, सुशांत जाधव, श्रीधर सकपाळ महेश सावंत, भीमसैनिक युवा प्रतिष्ठानचे आकाश कांबळे, सुमेध जाधव, अजय पवार, प्रफुल्ल मोहिते, और युवराज कदम आदी उपस्थित होते
जे विद्यार्थी वसतिगृहामध्ये होते त्यांना बाहेर जाण्यास आणि स्वतः व्यवस्था करून राहण्यास सांगण्यात आले आहे. हे विद्यार्थी स्वखर्चान बाहेर राहत आहेत. वसतिगृहात प्रवेश मिळावा यासाठी जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांना वसतिगृह इमारत मोडकळीस आली आहे असे सांगून प्रवेश देऊ शकत नाही, असे सांगण्यात येत आहे. हा प्रश्न सोडवा आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 03/Sep/2024
What's Your Reaction?