राज्य संवर्ग अधिकाऱ्यांच्या आंदोलनाला आठवडा पूर्ण; मुंबईत आजपासून आक्रोश मोर्चा
रत्नागिरी : राज्य नगर परिषद संवर्ग अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाला आठवडा पूर्ण झाला. अजूनही शासनाकडून या आंदोलनाची दखल घेतली गेलेली नाही, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायतींमधल्या अधिकाऱ्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. जिल्ह्याधिकाचऱ्यांना निवेदन देवून पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राज्यातील नगर परिषद, नगर पंचायतींमध्ये राज्य संवर्गातील सुमारे ३ हजार अधिकारी आणि ६० हजार स्थानिक कर्मचारी वर्ग सेवेत आहेत. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करावी किंवा राष्ट्रीय निवृत्त योजनेची अंमलबजावणी कराची या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने कामबंद आंदोलन २९ ऑगस्टपासून सुरू केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायतीतील अधिकारी, कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
सर्वसाधारण बदल्यांमधील जाचक अटी बगळल्या जाव्यात, आश्वासित प्रगती योजना लागू करावी, पदोन्नतीतील कोट्यामधील रिक्त पदे तत्काळ भरली जावीत, शासकीय ओळखपत्र मिळावीत, सहाय्यक अनुदान महिनाभर आगावू दिले जावे, सातव्या वेतन आयोगातील आणि महागाई भत्त्यातील फरकाची रकम मिळावी, अशा या अनेक मागण्यांसाठी गेल्या आठवडयाभरापासून कामबंद आंदोलन सुरू आहे.
या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदनही देण्यात आले आहे. परंतु अद्यापही शासनाने वा मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आठवडा पूर्ण होत आला तरी कामबंद आंदोलन सुरूच आहे.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने आता ६ सप्टेंबरपासून मुंबई आक्रोश मोर्चा व आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हे कामबंद आंदोलन सुरू असले तरी अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 06/Sep/2024
What's Your Reaction?