काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते आमच्याकडे येण्यासाठी नंबर लावून बसलेत; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाल्याने भाजप नेत्याचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. महाविकास आघाडीच्या पदरी मोठे अपयश आल्याने तीनही पक्षात अंतर्गत नाराजी दिसत आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राज्यात महायुतीचे सरकार येऊन महिन्याचा कालावधी लोटला आहे. दुसरीकडे मात्र सत्ताधारी व विरोधी पक्षात विविध कारणावरून आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले असतानाच भाजपच्या एका बड्या नेत्याने केलेल्या दाव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्यतील महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत नाही. सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळातच महायुतीमधील तीनही घटक पक्षात मंत्रि‍पदाची संधी न मिळाल्यामुळे नाराजी दिसत होती. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातही काही नेते नाराज असल्याचे पुढे आले होते.

त्यातच आता बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यात उमटत आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनीही विजय वडेट्टीवार यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. “काँग्रेस पक्षासह सर्वच पक्षातील नेते आमच्याकडे येण्यासाठी नंबर लावून बसले आहेत”, असा मोठा दावा गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केला आहे. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे.

बीडच्या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या विधानासंदर्भात गिरीश महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना महाजन म्हणाले, “विजय वडेट्टीवार हे काहीही बोलत असतात. आता राज्यातील विरोधी पक्षाची परिस्थिती कशी झाली आहे? हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे काहीतरी भडक बोलायचे आणि कोणावर तरी काहीतरी आरोप करायचे? असे विरोधकांचं काम झालं आहे. बीडच्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडून होणारे आरोप निराधार असल्याचा दावा महाजन यांनी केला आहे.

काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीत ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळांचा महायुतीने वापर केला. मात्र, त्यानंतर त्यांना न्याय दिला नाही. ते आमच्याकडे येऊ शकतात, असे वडेट्टीवार म्हणाले होते. त्याबाबत महाजनांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले, ‘छगन भुजबळ हे सक्षम आहेत, त्यामुळे ते ठरवतील. आता एवढ्या वाईट परिस्थितीत काँग्रेसकडे कोण जाईल? उलट त्यांच्याकडे जे आहेत तेच नेते आमच्याकडे नंबर लाऊन बसलेले आहेत,’ असा दावा महाजन यांनी केला आहे.