चिपळुण : पूररेषेच्या आतील भराव न हटविल्यास, अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

Jul 10, 2024 - 11:24
Jul 10, 2024 - 14:29
 0
चिपळुण : पूररेषेच्या आतील भराव न हटविल्यास, अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

चिपळूण : चिपळूण शहरात २०२१ मध्ये महापूर आला. यानंतर नागरिकांच्या उठावामुळे वाशिष्ठी आणि शिव नदीतील गाळ काढण्यात आला. मात्र, हा गाळ पूररेषेच्या आत टाकल्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. पूररेषेच्या आतील भराव न हटविल्यास आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्यास आपण काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन छेडू, असा इशारा काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी दिला आहे. या बाबत त्यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.

ते म्हणाले, सुमारे १० कोटींचा निधी खर्चुन वाशिष्ठी व शिव नदीतील गाळ काढण्यात आला आहे. मात्र, या गाळाने शहरातील अनेक सखल भाग बुजविले आहेत. या गाळाचा उपयोग शहरातील इमारती व बंगले उभारणीसाठी केला गेला आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी हा गाळ टाकून त्यावर इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे या भरावामुळे भविष्यात शहरात पूर आल्यास त्याची पातळी वाढण्याचा धोका आहे. रविवारी (दि.७) केवळ साडेतीन तास पडलेल्या पावसानंतर वाशिष्ठीच्या बाहेर पाणी आले, ही बाब गंभीर आहे. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना तत्काळ प्रशासनाने आवर घालावा व चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेल्या बांधकाम परवानगी रद्द कराव्यात; अन्यथा काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

चिपळूण शहर बशीसारखे आहे. त्यामुळे शहरातील गाळ काढल्यामुळे पाणी शहरातच साचून राहात आहे. त्यासाठी धामणदिवीपासून गाळ काढण्याची गरज आहे. शहरातील नदीकिनारी अतिक्रमणे वाढली आहेत. काहींनी भराव करून शेडदेखील बांधल्या आहेत. शिव नदीकिनाऱ्यावर पत्राशेडद्वारे भंगार व्यावसायिकांनी किनारे व्यापले आहेत.

पूररेषेतील गाळ व भराव काढावा
निळी व लाल रेषामध्ये अनेक बांधकामे सुरू आहेत. २०२१ च्या महापुरानंतर स्टिल्ट पार्किंग करून बांधकामाला परवानगी देण्याचा ठराव झाला आहे. मात्र, त्याची कोणतीच अंमलबजावणी करण्यात येत नाही. प्रशासन त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, भविष्यातील धोक्यास न. प. प्रशासन जबाबदार राहाणार आहे, असा इशारा शाह यांनी दिला असून, पूररेषेतील गाळ व भराव काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow