कशेडी बोगद्यातून पुन्हा गळती
खेड : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला लागलेली गळती काढण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने केला होता. परंतु, बुधवारी पुन्हा या बोगद्यातून दोन ते तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये असलेल्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ शंभर मीटरच्या अंतरात मोठी गळती सुरु झाली आहे. बोगद्यात शिरताच दुचाकी व चारचाकी वाहनचालक या पाण्याच्या फवाऱ्याने भिजत आहेत. या ठिकाणी पाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून प्लॅस्टिकचा वापर केल्याची बाब बुधवारी दि. १० रोजी निदर्शनास आली.
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील एका मार्गिकतून लहान वाहनांसाठी मुंबई व गोव्याच्या दिशेला जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासाचा कालावधी देखील कमी झाला आहे. मात्र, या बोगद्यात सिमेंटच्या छताला गळती लागली आहे. हा प्रकार अतिशय धोकादायक असून ही बाव सर्वच माध्यमांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बांधकाम विभागाने तज्ज्ञांचा सल्ला घेत गळती लागलेल्या ठिकाणी सिमेंट भरले होते.
कशेडी बोगद्यातून मोठ्या प्रमाणात गळणारे पाणी रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या ठेकेदार व अभियंत्यांनी केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने बोगद्यातून वाहतूक नक्की सुरक्षित आहे का? याची पुन्हा चाचपणी करणे आवश्यक आहे. कशेडी बोगद्याच्या कामात अनेक त्रुटी राहिल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून होत असून सुमारे ४०० कोटीपेक्षा जास्त निधी खर्चुन सुरू असलेल्या या कामाच्या दर्जाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 11/Jul/2024
What's Your Reaction?