रत्नागिरी : नवीन भाजी मार्केटमधील गाळे खाली करण्यासाठी 15 जुलैची डेडलाईन
रत्नागिरी : नगर परिषदेच्या शहरातील डॉ.बा.ना.सावंत रोड येथील अति धोकादायक बनलेल्या नवीन भाजी मार्केट इमारतीमधील आतील, बाहेरील सर्व गाळेधारकांना गाळे रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली आहे. तरीही अजून काहीजण त्या इमारतीत ठाण मांडलेले आहे. गुरूवारी न.प.प्रशासनामार्फत कारवाईचे पाउल उचलण्यात आल्याने गाळेधारकांची धावपळ उडाली. मंगळवार 15 जुलैपर्यंत गाळे खाली करण्याचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर तत्काळ पुढील कारवाई केली जाणार आहे.
नगर परिषदेच्या नगर रचनाकार विभागाने पावसामध्ये धोकादायक बनलेल्या शहरातील 71 इमलेधारकांना यापूर्वी नोटीस बजावली आहे. अतिधोकादायक इमले पाडून सुरक्षित ठिकाणी जावे किंवा तत्काळ दुरुस्ती करावी, असे नोटिशीमध्ये स्पष्ट केले आहे. परंतु शहरात नवीन भाजीमार्केटची इमारत अति धोकादायक आहे. ती वगळता एकही इमारत अति धोकादायक नसल्याचे या विभागाने सांगितले आहे. रत्नागिरी न.प. आणि नगररचना विभागाने मे महिन्यात केलेल्या सर्व्हेमध्ये शहरात काही धोकादायक इमारतींची माहिती पुढे आली. याबाबत नगररचना विभागाने नगर परिषदेला अवगत करून धोकादायक इमारत मालकांना तत्काळ नोटिसा बजावल्या होत्या.
पावसाळ्यातील खबरदारी म्हणून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनांतर्गत शहरातील या 71 इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार मालकांना अतिधोकादायक इमारत असल्यास ती रिकामी करावी, असे नोटिसीत म्हटले आहे. तर ज्या इमारती धोकादायक आहेत, परंतु त्यांची दुरुस्ती अनिवार्य आहे, अशा इमारती दुरुस्त करण्यास सांगण्यात आले.
नगर परिषदेच्या डॉ. बा.ना.सावंत रोडवरील नवीन भाजी मार्केटची इमारत अतिधोकादायक बनली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हे स्पष्ट झाले आहे. इमारतीच्या आतील, बाहेरील सर्व गाळेधारकांना नोटीस बजावून गाळे रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. त्या नोटिशीविरुद्ध गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर सर्व गाळेधारकांना आपापले गाळे खाली करून न.प.च्या ताब्यात देण्याची नोटीसही देण्यात आली. गाळेधारकांच्या कराराची मुदत संपली नसल्याने त्या नोटिशी विरुद्ध काही वर्षांपूर्वी न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयात प्रलंबित प्रकरणी अंतिम युक्तिवाद होणे शिल्लक आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनांतर्गत खबरदारी म्हणून गाळेधारकांना पुन्हा नोटीस बजावली आहे. पण अति धोकादायक बनलेली नवीन भाजी मार्केटची इमारत कधीही पडण्याची भीती आहे. इमारतीच्या स्लॅबचे स्टील खराब झाल्याने बांधकाम देखील निसटले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या इमारतीतील गाळे रिकामे करून घ्यावेत. नोटीसनुसार कारवाई न झाल्यास कोणतीही दुर्घटना घडल्यास होणाऱ्या जीवित व वित्तहानीस संबंधित गाळेधारक जबाबदार असतील, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नोटीसलाच स्थगिती मिळावी यासाठी गाळेधारक न्यायालयात गेले आहेत.
तेथील धोका लक्षात घेत गुरूवारी नगर परिषद प्रशासनातील अधिकारी नंदकुमार पाटील यांच्यासह कर्मचारी पोलीस बंदोबस्तात कारवाईसाठी गेले होते. कारवाईसाठी न.प.ची टिम दाखल होता तेथील गाळेधारकीं चांगलीच धावपळ उडाली. त्यांनी कारवाईसाठी आलेल्या न.प.च्या यंत्रणेला विरोधही दर्शवला. पण न.प.प्रशासन कारवाईसाठी ठाम असल्याने गाळेधारकांना मंगळवार 15 जुलैपर्यंत गाळे खाली करण्याचा अवधी देण्यात आला आहे. त्या अवधीत गाळेधारक न हटल्यास या इमारतीतील कारवाई अटळ असल्याने न.प.प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 12-07-2024
What's Your Reaction?