खेड : नातुवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू....

Jul 12, 2024 - 10:45
 0
खेड : नातुवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू....

खेड : कडक उन्हाळ्यामुळे तालुक्यातील धरणांतील पाण्याची पातळी खालावली होती. परंतु, गेल्या महिन्यात पडलेल्या मूसळधार पावसाने धरणांतील पाण्याची पातळी वेगाने वाढली असून, बुधवार दि.१० रोजी पहाटे खेड तालुक्यातील नातुवाडी धरणातील पाणीसाठा सांडव्याच्या उंचीपर्यंत झाला असून धरण भरल्याने त्याचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला असून, पावसाचे आणखी तीन महिने शिल्लक असल्याने धरणात उपयुक्त पाणी साठा वाढून पाणी जमिनीत अधिक जिरून भूजल पातळी देखील वाढणार आहे.

कोकणात जून महिन्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मधील नातुवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हा प्रकल्प चोरद नदीच्या उप नाल्यावर नातुनगर येथे बांधलेला असून, धरणाची पूर्ण संचय पातळी ९२.५० मी. असुन उपयुक्त साठा २७.२३ दशलक्ष घन मीटर आहे. धरणाची सांडवा माथा पातळी ८७.५० मी. असून, या पातळीपर्यंत धरणातील उपयुक्त साठा १८.३७७ दशलक्ष घन मीटर इतका आहे. येथील सांडव्यावर १२५ मीटर आकाराचे तीन वक्राकार दरवाजे बसविण्यात आले आहेत. बुधवारी पहाटे १.४५ वा. धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून या वेळी धरणाची पाणी पातळी ८७.५१ मी. होती व सांडव्यावरुन ०.१९४ घन मीटर प्रति सेकंद इतका विसर्ग सुरु झाला आहे.

धरणात ६७.४९ टक्के उपयुक्त पाणी
सद्यस्थितीत धरणात ६७.४९ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणामुळे कोकणात शेतीसाठी वर्षभर पाणी उपलब्ध होत असल्याने दुबार पीक घेणारे शेतकरी धरण भरून वाहू लागल्याने सुखावले आहेत. खेड शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला देखील उन्हाळ्यात या धरणातून पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याने खेड शहरवासीयदेखील आनंदी आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 12/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow