लांजात मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना
लांजा : सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने लांजा शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढले. तालुक्यातील मुचकुंदी नदीने इशारा पातळी ओलांडली होती. तसेच काजळी, नावेरी या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. या मुसळधार पावसामुळे तालुक्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.
शनिवारी सकाळपासूनच तालुक्यात पावसाची संततधार सुरू झाली होती. मात्र, सायंकाळी पावसाचा जोर वाढू लागला. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती; परंतु रविवारी पहाटे पुन्हा पाऊस सुरू झाला. रविवार सकाळपासूनच पावसाने धुमधडाका सुरू केला होता. उत्तरोत्तर पावसाचा जोर वाढत गेल्याने तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना पावसामुळे वारंवार मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील डिसाळपणा आणि गटारांच्या अर्धवट कामांमुळे बाजारपेठेतील व्यापारांची पावसामुळे दैना उडाली.
नुकसानीच्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील पुनस सरोदेवाडी येथील सुनंदा अनंत वाघाटे या महिलेच्या घराच्या पडवीवर सागाचे झाड पडून सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, तर कुर्णे पडयारगाव येथील मंगेश तुकाराम पडये यांच्या गोठयावर झाड पडून गोठ्याचे सुमारे १५ ते २० हजारांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील झालेल्या या पडझडीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रविवारी लांजा तालुक्यात १०४ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या घटनांची माहीती लांजा तहसील कार्यालयात देण्यात आली असून संबंधित नुकसानाचे तलाठ्चांमार्फत पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 17/Jul/2024
What's Your Reaction?