मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत
रत्नागिरी : सातत्याने कोसळणाऱ्या जोरदार पावसाने रविवारीही रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्यातील शास्त्री, काजळी, कोदवली, मुचकुंदी या चार नद्या इशारा पातळीच्या वर, तर जगबुडी नदी धोका पातळीच्या वर वाहत होती. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी ग्रामीण भागात पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाला लागल्याने महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. जिल्ह्यात दिवसभरात ८८०.९० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सरासरी ९७.८८ मि.मी. पाऊस पडला आहे.
गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम असून, खेड तालुक्यातील जगबुडी नदी सातत्याने इशारा पातळीवर वाहत आहे. रविवारी कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे जगबुडी नदी ७ मीटरची धोका पातळी पार करुन ८.५० मीटर एवढी वाहत होती. त्यामुळे खेड शहरात नदी लगतच्या भागात पाणी भरले होते. संगमेश्वर शहरालगत वाहणाऱ्या शास्त्री नदीही दुथडी भरुन वाहत होती. त्यामुळे संगमेश्वर शहरालगत पाणी घुसण्यास सुरुवात झाली होती. लांजा तालुक्यातून वाहणारी काजळी नदीही धोका पातळीच्या जवळून वाहत होती. जवळपास १८.३० मीटर इतकी पाण्याची पातळी वाढली होती. नदीला आलेल्या पुराचे पाणी मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाला लागून वाहत होते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दुपारी तीन वाजल्यापासून बंद करण्यात आली होती. सायंकाळी ६ वाजता पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. जवळपास ३ तास वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या ठिकाणी महामार्ग वाहतूक पोलिसांसह लांजा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. पुलाच्या दोन्ही बाजूने बॅरेकेटस लावून रस्ता बंद ठेवल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. काजळी नदीच्या बाजुने असणाऱ्या हरचिरी, चांदराई गावामध्ये पाणी घुसल्याने बाजारपेठ बंद ठेवली होती. व्यावसायिकांनी सामान हलवल्याने मोठे नुकसान टळले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 22-07-2024
What's Your Reaction?