चिपळूण : परशुराम ते खेरशेत महामार्गावर निकृष्ट दर्जाचे काम
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे. त्यामध्ये परशुराम ते खेरशेत या मार्गावरील काम निकृष्ट असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे जनता वेठीस धरली जात असून या संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिपळूण- गुहागर विधानसभा मतदार संघाचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाविषयी सावंत म्हणाले, महामार्गाचे काम गेले काही वर्ष सुरू असून ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. उलट या महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबतच शंका आहे. चिपळूण बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. त्या पुलाच्या कामात लागणारे गर्डर कोंडमळा येथे तयार केले जात होते; मात्र, ते गर्डर रस्त्याशेजारीच ठेवण्यात आल्यामुळे ग्रामस्थांना त्याचा त्रास होतो. या विरोधात ग्रामस्थांना रस्त्यावर उत्तरवावे लागले तसेच सावर्डेवासीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधात आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल केले; परंतु बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही याचेच सर्वांना आश्चर्य वाटते.
चिपळूण बहादूरशेखनाका येथील पूल नऊ महिन्यांपूर्वी कोसळला होता. ते काम निकृष्ट असल्याचे पुढे येत आहे. कोंडमळा येथील गर्डर तोडण्याची नामुष्की ठेकेदारावर आली तसेच गेल्या काही महिन्यांपूर्वी परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली. चिपळूण शहरातील उड्डाणपुलाच्या पियर कॅप काढण्याचे काम सुरू असताना तीन कामगार जमिनीवर पडून जखमी झाले. सावर्डे-वहाळ फाट्यावरील पूल खचला आहे. त्या पुलाच्या संरक्षक भिंतीलाही तडे गेले आहेत.
कामाच्या दर्जाबाबत शंका
ठेकेदार कंपनीकडून महामार्गाच्या झालेल्या कामाच्या दर्जाबाबत शंका आहे. या प्रकारांना जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हावी अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत व असुर्डे सरपंच पंकज साळवी यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:17 PM 22/Jul/2024
What's Your Reaction?