Ratnagiri : मिऱ्या बंधाऱ्याला भगदाड
◼️ मानवी वस्तीत समु्द्राचे पाणी घुसण्याची भीती; पंधरामाड येथील नागरिक भयभीत
रत्नागिरी : समु्द्राला आलेल्या उधाणामुळे अज्रस्त्र लाटा किनाऱ्यावर आदळत आहे. त्याचा फटका मिऱ्याच्या संरक्षक बंधाऱ्याला बसला आहे. लाटांच्या ताडाख्यामुळे पंधरामाड येथे संरक्षक बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले आहे. तेथून समु्द्राचे पाणी मानवी वस्तीत घुसण्याची शक्यता आहे. लाटाचा तडाखा कायम राहिल्यास पंधरामाड येथील वस्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे व जोरदार वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून जोरदार लाटांचा प्रहार किनाऱ्यावर होत आहे. मुरुगवाडा ते मिऱ्या दरम्यान किनाऱ्यावर लाटांचा मारा मोठ्याप्रमाणात होत आहे. याठिकाणी असणार्या जुन्या बंधाऱ्याला लाटांच्या माऱ्याने भगदाड पडले आहे. या बंधाऱ्याचे दगड लाटांच्या मार्याने समुद्रात सरकत आहेत. त्यामुळे पडलेल्या भगदाडातून पाणी आत नागरी वस्तीच्या दिशेने येत आहे.
मिऱ्या ते मुरुगवाडा दरम्यान बंधाऱ्याचे काम सुरु असून त्यातील शंभर ते दोनशे मीटरचे काम शिल्लक आहे. या शिल्लक असलेल्या ठिकाणीच आता भगदाड पडले आहे. उर्वरीत किनारा सुरक्षित करण्यासाठी बंधाऱ्यावर टेट्रापॉट टाकण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे लाटांचा मारा कमी करण्यासाठी गोयन पध्दतीचे बंधारेही टाकण्यात आले आहेत.
ज्याठिकाणी पंधरामाड परिसरात बंधाऱ्याला भगदाड पडले आहे. या भागातील काम पाऊस कमी झाल्यानंतर सुरु केले जाणार आहे. पुढील पावसाळ्यात या भागाला धोका जाणवणार नाही. परंतु यावर्षीचा पावसाळा येथील नागरिकांना भितीच्या छायेखालीच घालवावा लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 25-07-2024
What's Your Reaction?