'वंचित' ची आजपासून आरक्षण बचाव रॅली
मुंबई : आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात सातत्याने तणाव वाढत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण हा महत्वाचा मुद्दा झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे.
राज्यातील या जिल्ह्यातून जाणार यात्रा
वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव रॅलीची सुरुवात दादर येथील चैत्यभूमीपासून सुरु होत आहे. ही रॅली राज्यातील अनेक जिल्ह्यातून जाणार आहे. मुंबईतून ही यात्रा पुणे येथील महात्मा फुले वाड्यात येईल. त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशीव, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना, बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून आरक्षण बचाव यात्रा जाणार आहे. ७ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोठी सभा होणार आहे. या ठिकाणी ही रॅली थांबणार आहे.
महाराष्ट्रात सलोखा कायम रहावा यासाठी आरक्षण यात्रा
महाराष्ट्रात वनवा पेटू नये. महाराष्ट्र शांत रहावा. सलोखा टिकून रहावा या दृष्टिकोनातून आम्ही 25 तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू करत आहोत. उद्या चैत्यभूमीपासून ही यात्रा सुरू होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा होऊन या यात्रेची सांगता होणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
ओबीसी समाज दहशतीत
ॲड. आंबेडकर म्हणाले की, एकीकडे ओबीसी समाज प्रचंड घाबरलेला आहे. विशेषतः छोटा ओबीसी घटक घाबरलेला आहे. 12 दिवसांत लहान ओबीसी नेत्यांवर हल्ला झाला आहे. नाभिक समाजाची दुकाने जाळली आहेत. जी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे की, लहान ओबीसींच्या दुकानावर जायचे नाही, काही विकत घ्यायचे नाही असेही आदेश निघाले आहेत. ही परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे. मध्यंतरी शरद पवार यांचे स्टेटमेंट होते की, आम्ही विधानसभेला 225 आमदार निवडून आणणार आहोत. यामुळे राज्यातील परिस्थिती अजून भयाण झालेली असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना, संघटनांना पक्षाच्या वतीने आम्ही निमंत्रणाचे पत्र लिहिले आहे ते यामध्ये सामील होत आहेत. शरद पवार हे विरोधी पक्षात आहेत त्यांनाही या यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. शांतता प्रस्थापित करणे आणि जनजागृती करणे हा आरक्षण बचाव यात्रेचा हेतू असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी नमूद केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 25-07-2024
What's Your Reaction?