जिल्हा नियोजनचा निधी वेळेत खर्च करा : पालकमंत्री उदय सामंत

Jul 26, 2024 - 11:45
Jul 26, 2024 - 11:49
 0
जिल्हा नियोजनचा निधी वेळेत खर्च करा : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : जिल्हा नियोजनमधून करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या प्रस्तावाला सर्व यंत्रणांनी लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता घ्यावी. त्यानंतर जिल्हा नियोजन कार्यालयाने तातडीने निधी वितरित करावा, हा निधीही वेळेत खर्च करावा, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील उदय सामंत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री सामंत बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना, विमानतळ, प्रांत कार्यालय भूमिपूजन, मिनी थिएटर, लोकमान्य टिळक स्मारक लोकार्पण आदींबाबत पालकमंत्री यांनी आढावा घेतला. पालकमंत्री सामंत म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संभाव्य दौऱ्यातील विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येणार आहे.

सर्व यंत्रणांनी जबाबदारीने आणि गतीने ही कामे मार्गी लावावीत. त्याचबरोबर या सोहळ्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबतही संबंधित यंत्रणेने कार्यवाही पूर्ण करावी. महसूल सप्ताहात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात मोठा कार्यक्रम घ्यावा आणि लाभार्थ्यांना लाभ द्यावा. जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाबाबतही सर्व विभागप्रमुखांनी लवकरात लवकर कार्यवाही पूर्ण करावी. या प्रसंगी जिल्हाधिकारी सिंह यांनीही विविध यंत्रणांकडून कामांबाबतचा आढावा घेतला.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 26/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow