'लाडकी बहिण'चा एखाद दुसरा हफ्ता देऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न : शरद पवार
मुंबई : राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून गदारोळ सुरू आहे. योजनेवर विरोधकांनी टीका केली त्याचबरोबर अर्थखात्याने देखील यावर आक्षेप घेतला आहे. या योजनांबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
सरकारच्या या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. एखादं दुसरा हफ्ता देऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही शरद पवार (Sharad Pawar) पुढे म्हणालेत.
लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला संधी
आजच्या राज्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे, असं मत जनतेचं झालं आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणंचं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला संधी आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही एकसंघ पर्याय दिला होता. विधानसभेसाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याला मूर्त स्वरुप आले पाहिजे. मूर्त स्वरुप आले तर लोकसभेसारखी स्थिती दिसून येईल. नाही आले तर आजच्या राज्यकर्त्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे. परंतु लोकसभेसारखा स्पष्ट निकाल लागणार नाही, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. लोकसभेसारखा निकाल येण्यासाठी महाविकास आघाडीत एकी हवी आहे. लोकांना आता पर्याय द्यावा, असे तिन्ही पक्षांत एकमत आहे.
संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीतील जागा वाटपावर चर्चा होणार आहे. तीन दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली. त्यामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत यांनी तडजोडीसाठी जी समिती करायची त्याची नावे दिली. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची नावे दिली आहेत. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी काही नावे दिली आहे. त्यांच्या बैठकीची प्रक्रिया 12 तारखेनंतर सुरू होईल. काही झालं तरी जागेचा निर्णय घ्यावा, एकवाक्यता ठेवावी आणि लोकांना पर्याय द्यावा हे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवलं आहे. तसेच लोकसभा निवडणुकी डाव्या पक्षांनी मदत केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना एकही जागा दिली नव्हती. आता त्यांच्यासाठी काही जागा सोडल्या पाहिजे, असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.
डाव्या पक्षांना महाविकास आघाडीत जागा देण्याची माझी भूमिका
विधानसभा निवडणुकीला समोर जाताना एकत्र लढण्याची आमची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व एकत्र आले तर ठीक अन्यथा त्याची किंमत मोजावी लागेल. तीन दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली, यावेळी संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी जागावाटप चर्चेसाठी होणाऱ्या कमिटीचे नावं दिली आहेत. प्रमुख पक्षासोबत डावे पक्ष सोबत घ्यावे आणि त्यांना काही जागा द्यावं असे मी सुचवलं आहे असंही शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटलं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:39 27-07-2024
What's Your Reaction?