रत्नागिरी : काजू बी साठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
◼️ अर्जाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत
रत्नागिरी : काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासनाकडून वित्तीय साह्य उपलब्ध करून दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल, ही गोष्ट विचारात घेऊन २०२४ च्या काजू हंगामासाठी शासनाने काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य काजू मंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी दिली.
काजू उत्पादक शेतकऱ्याच्या सात-बाऱ्यावर काजू लागवडीखालील क्षेत्र किंवा झाडांची नोंद असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षम काजूच्या झाडांची संख्या व त्यापासून प्राप्त काजू बी उत्पादन हे संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडील नोंदणीकृत परवानाधारक काजू व्यापारी, नोंदणीकृत सहकारी संस्था, खरेदी-विक्री संघ व नोंदणीकृत काजू प्रक्रियादार यांना काजू बी ची विक्री केलेली असणे आवश्यक आहे. काजू उत्पादक शेतकऱ्याने विक्री केलेल्या काजूच्या विक्री पावतीवर नोंदणीकृत खरेदीदाराचा जीएसटी क्रमांक देणे गरजेचे आहे.
या योजनेच्या लाभासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी काजू बी विक्री पावती, सात-बारा आधार संलग्नित बचत बैंक खात्याच्या क्रमांकासह तपशील, कृषी विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तपशिलासह अर्ज राज्य काजू मंडळाकडे ३१ ऑगस्टपर्यंत सादर करावयाचा आहे. जिल्ह्यामधील संबंधित काजू उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य काजू मंडळाच्या कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करून अनुदान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कदम यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:55 01-08-2024
What's Your Reaction?