आगामी निवडणुकीत कुणबी समाजाची ताकद दाखवणार; कुणबी सेनेचा इशारा
चिपळूण : कोकणातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी कुणबी समाजाबाबत आणि त्यांच्या समस्यांबाबत अधिवेशनात आवाज उठविलेला नाही. त्यांच्या प्रश्नांची फारशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे या लोकप्रतिनिधींना कुणबी समाजाशिवाय निवडणुका जिंकणे अशक्य आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कुणबी समाज आपली जागा दाखवेल, असा इशारा कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनानाथ रावणंग, जिल्हा सचिव प्रदीप उदेग, तालुकाप्रमुख संजय जाबरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यासंदर्भात प्रदीप उदेग म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, कुणबी समाजाच्या प्रश्नांबाबत आवाज उठविण्यास त्यांना वेळ नाही. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण प्रांतात ऐंशी टक्के कुणबी समाजाची लोकसंख्या आहे. या समाजाने त्या त्या वेळी कोकण विकासाचा विचार करून राजकीय पक्षांना साथ दिली. त्यामध्ये कुणबी समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा धुळीस मिळाली आहे.
१९९० पर्यंत कुणबी समाजाचे बारा आमदार निवडून येत होते. स्व. शामराव पेजे यांच्या नेतृत्वाखाली ते आमदार विजयी व्हायचे. मात्र, आज आहे. एकही कुणबी समाजाचा आमदार नाही. ही सल समाजबांधवांमध्ये आहे. संगमेश्वर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये कुणबी सेनेचे उमेदवार सुरेश भायजे यांच्यारूपाने समाजाची ताकद दाखविण्यात आली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत राजकीय पक्षांना निवडणुका जिंकणे अशक्य आहे. या समाजाचा आतापर्यंत मतांसाठीच वापर झाला. मात्र, आता हा समाज भूलथापांना बळी पडणार नाही. त्यासाठी आत्तापासूनच सामाजिक स्तरावर तयारी सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीत कुणबी समाजाचे उमेदवार रिंगणात उतरतील, असा इशाराही प्रदीप उदेग यांनी दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 10/Aug/2024
What's Your Reaction?