चिपळूणातील ब्ल्यू, रेड लाईनचा निर्णय आठ दिवसांत : पालकमंत्री उदय सामंत
चिपळूण : चिपळूणसह राज्यातील १७ शहरांच्या ब्ल्यू आणि रेड लाईनचा प्रश्न पुढील आठ दिवसांत मार्गी लागेल, असे आश्वासन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण दौऱ्यात दिले. केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण डिसेंबरअखेर पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चिपळूण शहरातील विविध शासकीय कामांचे लोकार्पण करण्यासाठी पालकमंत्री सामंत रविवारी चिपळूणच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी पत्रकारांनी त्यांना शहराच्या ब्ल्यू आणि रेड लाईनसंदर्भात तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात प्रश्न विचारला. गणेशोत्सव जवळ आला आहे. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शासनस्तरावर काय प्रयत्न सुरू आहेत असे विचारता ते म्हणाले, केवळ चिपळूण नाही तर महाराष्ट्रातील १७ शहरांच्या ब्ल्यू आणि रेड लाईनसंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील आठ दिवसांत विस्तारीत बैठक लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत चिपळूणला न्याय मिळेल.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात बोलताना सामंत म्हणाले, आम्ही जसे चांगल्या कामाचे श्रेय घेतो तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाचे श्रेयसुद्धा घेतले पाहिजे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नंतर ठेकेदार हे काम सोडून गेल्यामुळे मागील १२ वर्षे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, डिसेंबरअखेर पूल सोडून संपूर्ण महामार्ग तयार होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 20/Aug/2024
What's Your Reaction?