लांजा : डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द होऊ शकत नाही - किरण सामंत
लांजा : डम्पिंग ग्राउंडसाठी योग्य जागा उपलब्ध असताना कोत्रेवडी येथील अयोग्य जागेची निवड होतेच कशी? आणि अशा प्रकारे शासनाचा पैसा वाया घालवण्याला जबाबदार कोण? असा रोखठोक सवाल कोत्रेवाडी ग्रामस्थांनी रत्नसिंधू योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्यासमोर उपस्थित केला, त्यावर हा प्रकल्प मी रद्द करू शकत नाही असे सामंत यांनी सांगितले. रत्न सिंधू योजनेचे सदस्य किरण सामंत यांनी रविवारी रात्री कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेतली आणि या लढ्यात मी तुमच्यासोबत आहे असे सांगितले. मात्र, कोत्रेवाडी ग्रामस्थांनी हा प्रकल्प रद्द करा, अशी मागणी केली.
यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. मुळातच डम्पिंग ग्राउंडसाठी नगरपंचायतीकडे योग्य असे प्रस्ताव आलेले असताना व जिल्हा निवड समितीने नाकारलेली आणि डम्पिंग ग्राउंडसाठी सर्वाथनि अयोग्य असलेली कोत्रेवाडी येथील जागेची निवड कशी काय केली गेली? या संपूर्ण प्रकारात पाणी मुरलेले असून आम्ही याची सखोल चौकशी करणार आहोत. तुम्ही हा प्रकल्प जर रद्द करणार असाल तर आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहतो अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. मात्र हा प्रकल्प मी रद्द करू शकत नाही असे किरण सामंत यांनी सांगितले.
ग्रामस्थांनी आम्हाला हा प्रकल्प नकोच आहे. हा प्रकल्प आम्ही हद्दपार करणारच. त्यामुळे आमचा लढा हा यापुढेही आम्ही कायम चालू ठेवणार आहोत. तसेच नगरपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाची सत्ता आहे. मग हा प्रकल्प रद्द करण्याचाबतचा प्रस्ताव का केला जात नाही? कोत्रेवाडी येथील डम्पिंगसाठी अयोग्य असलेला जागेवरच नगरपंचायतीचे घोडे का अडले आहे? या संपूर्ण प्रकरणाची आम्ही पोलखोल करणार आहोत. या प्रकरणात जे कोणी अडकले आहेत त्या सर्वांची आम्ही चौकशी करणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प रद्द करण्यावर आम्ही ठाम असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, किरण सामंत प्रकल्प रद्द करतील अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 03/Sep/2024
What's Your Reaction?