रत्नागिरी : मिऱ्या बंधाऱ्याच्या कामाचा मुहूर्त हुकला

Jun 11, 2024 - 12:46
Jun 11, 2024 - 15:49
 0
रत्नागिरी : मिऱ्या बंधाऱ्याच्या कामाचा मुहूर्त हुकला

रत्नागिरी : मिऱ्या बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या सुमारे अडीचशे मीटरच्या टप्प्याच्या कामाचा मुहूर्त हुकला आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे या धोकादायक टप्प्याचे काम आता पावसाळ्यांतर होणार आहे. परंतु उधाणाच्या भरतीमुळे काही धोका झाल्यास त्याची तयारी आम्ही ठेवल्याची माहिती पत्तन विभागाने दिली. त्यामुळे पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंत किनाऱ्याची धूप होण्याचा धोका कायम आहे.

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या पक्क्या कामाला सुरवात झाली असून साडेतीन किमीपैकी अडीचशे मीटरचे काम शिल्लक आहे. पत्तन विभागाने केलेल्या सर्व्हेमधील सात डेंजर झोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचे काम झाले आहे. परंतु पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा टप्पा शिल्लक आहे. या टप्प्याचे काम करताना यंत्रसामग्रीची ने- आण करण्यासाठी लागणारी जागेवरून वाद निर्माण झाला. जागा मालकाने याला विरोध केल्यामुळे काम रखडले होते. हे काम व्हावे यासाठी स्थानिकांनी पत्तन विभागाला निवेदनही दिले. परंतु पावसाळा सुरू झाला तरी अजून या कामाला काही मुहूर्त मिळालेला नाही.

याबाबत पत्तन विभागाशी चर्चा केली असता हे काम या पावसाळ्यात होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले. या बंधाऱ्याचा बेस तयार करण्यासाठी समुद्रात खोदकाम करावे लागणार आहे. आता पावसळ्यात समुद्राला उधाण असल्याने हे काम करणे शक्य नाही. त्यामुळे अडीचशे मीटरच्या बंधाऱ्याचा कामाचा मुहूर्त हुकला आहे.

पावसाळा संपल्यानंतर हे काम होणार आहे. परंतु हा डेंजर झोन असल्याने या भागात किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप होणार आहे. तसेच पाणी तेथील वस्तीत शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:12 PM 11/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow