कुर्धे नदीवरील लोखंडी साकव धोकादायक
पावस : रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे नदीवरील लोखंडी साकव धोकादायक बनला असून, कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. या परिसरातील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांचा शाळेत जाण्याचा व इतर मार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तातडीने लोखंडी साकवाची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या गावातील फडकेवाडी, खोताचीवाडी, गणेशगुळेचा काही भाग या भागातील अनेक शालेय विद्यार्थी प्राथमिक शाळा व हायस्कूल नदीपलीकडे पावसाळ्यामध्ये या लोखंडी साकवाच्या माध्यमातून ये-जा करत असतात, त्याचबरोचर ग्रामस्थ या साकवाचा वापर करत असतात. चार वर्षापूर्वी या लोखंडी सातवाची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या रंगरंगोटी व इतर गोष्टींकडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दुर्लक्ष केल्यामुळे हा साकव कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. या साकवावरील अनेक हुक गंजलेल्या स्थितीत असल्यामुळे काही भाग त्या पॅनेलमधून सुटलेला आहे. त्यामुळे हा साकव मोडकळीस आल्पास या परिसरातील लोकांचा व शालेय विद्यार्थी यांचा पावसाळ्यामध्ये संपर्क तुटण्याची शक्यता आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर ग्रामसेवक व तलाठी यांनी साकवाची पाहणी केली.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याचा वापर केला जात नाही; मात्र पावसाळ्याचे तीन-चार महिने या लोखंडी साकवाचा वापर केला जातो; मात्र याची दुरुस्ती न झाल्यास कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुरुस्तीची मागणी
कुर्धे नदीवरील लोखंडी साकव धोकादायक बनला असल्याने कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मार्ग बंद झाल्यास विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल होणार आहे. त्यामुळे लोखंडी साकवाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 10/Jul/2024
What's Your Reaction?