रत्नागिरीतील अभियांत्रिकी कॉलेजला लोकनेते शामराव पेजे यांचे नाव : ना. उदय सामंत
![रत्नागिरीतील अभियांत्रिकी कॉलेजला लोकनेते शामराव पेजे यांचे नाव : ना. उदय सामंत](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202405/image_870x_665803895b922.jpg)
रत्नागिरी : रत्नागिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीसाठी २५० कोटी रुपये मंजूर आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, ७५० विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे. १५ ऑगस्टला नवीन इमारतीचे उद्घाटन होणार असून, लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय या नावाने हे महाविद्यालय ओळखले जाईल. त्यामुळे कुणबी समाज बांधवांची मागणी पूर्ण होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
लोकनेते शामराव पेजे यांच्या नावाला केंद्र शासनाकडूनही मान्यता आलेली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
त्याचप्रमाणे शीळ जॅकवेलवर नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी जिल्हा नियोजनमधून दीड कोटी रुपये देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शीळ धरण येथे जुन्या ट्रान्सफार्मरमध्ये काहीतरी तांत्रिक दोष होण्याची भिती आहे. त्यामुळे दक्षता म्हणून दीड कोटी मंजूर करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. यावेळी ते म्हणाले की, शहरातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. शहराच्या खालच्या भागात होणाऱ्या ८ कोटीच्या जलतरण तलावाची पाहणी केली. १०५ कोटीच्या पोलिस गृहनिर्माण वसाहतीच्या कामाची पाहणी केली. १५ कोटीच्या शासकीय ग्रंथालयाच्या कामाची पाहणी केली. थ्रीडी शोच्या २० कोटीच्या कामाची पाहणी केली. एसटी बसडेपो व वसाहतीच्या ५ कोटीच्या कामाचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या ५ कोटीच्या कामाची माहिती घेतली. जिल्हा क्रीडा संकुलाच्या २० कोटीच्या कामाचाही आढावा घेतला. तसचे प्राणी संग्रहालयाच्या कामही जोरात सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. यातील अनेक कामांचा १५ ऑगस्टला लोकार्पण सोहळा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी क्रिकेटपटू प्रविण आंब्रे यांच्या इंग्रजी आत्मचरित्राचे मराठीत प्रकाशन करण्यात येणार आहे. रत्नागिरीत होणाऱ्या या कार्यक्रमाला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव, तसेच विद्यमान कर्णधार रोहित शर्मा येण्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन समितीचा ३६० कोटीचा विकास आराखडा मंजूर आहे. परंतु आचारसंहितेमुळे त्या कामांना काहीसा अडथळा आला होता. या निधीचे नियोजन करुन लवकरातलवकर खर्च करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्जु प्रकरणात राजकीय सहन न करता तपास करा
आर्जु प्रकरणात संशयित आरोपी राजकीय पक्षांची नावे घेत आहेत. अगदी ते शिवसेनेचे नाव घेत असतील तरीही त्यांनी सोडू नका, त्यांच्यावर कडक कारवाई करुन सर्वसामान्य पैसे भरणाऱ्यांना न्याय द्या, अशा सूचना पोलिसांना दिल्या असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 30-05-2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)