संगमेश्वर : निवे बुद्रुक ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवास

Jul 12, 2024 - 15:14
Jul 12, 2024 - 15:19
 0
संगमेश्वर : निवे बुद्रुक ग्रामस्थ व  विद्यार्थ्यांचा  चिखलातून प्रवास

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराचा फटका ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना बसत आहे. रस्त्याला गटार नसल्याने पावसाचे पाणी तसेच चिखलातूनच विद्यार्थी तसेच नागरिकांना वाट काढावी लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे गुरुवारी निवेदन देऊन तक्रार केली आहे.

सध्या निवे बुद्रुक ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी सुरू असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत अंतर्गत मधलीवाडी, शिंदेवाडी, बौद्धवाडी, आडी या रस्त्याला गटार न बांधल्यामुळे पावसाळ्यात नागरिक तसेच विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. काही ठिकाणी तर पाणी तुंबून चिखल होत आहे. यातून विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे. 

गेली पाच वर्ष याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. हे गटार २०२०-२१ ला मंजूर असल्याचे समजते. मात्र मंजूर असूनसुद्धा अनेक वर्ष कागदावरच दिसून येत आहे. वास्तविक, गटाराचे टेंडरसुद्धा निघाले असून ठेकेदारही निश्चित झाला आहे. मात्र, अजूनही ठेकेदाराने कामाला सुरुवात केली नसल्याचे दिसत असतानासुद्धा ग्रामपंचायत त्या ठेकेदाराला पाठीशी घालत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले आहे.

...अन्यथा आमरण उपोषण
संबंधीत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाई करावी. तसेच ग्रामपंचायतीचे दप्तर तपासावे, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्यात येईल, असेही ग्रामस्थांनी या निवेदनात नमूद केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 12/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow