राजापूर : वीजवाहिन्या टाकण्यासाठी अर्जुना नदीत उडी घेण्याचे धाडस !
राजापूर : राजापुरातील अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे नदीच्या काठावरील शीळ, पावसकरवाडी व उन्हाळे मोंडेवाडी या दोन गावांना जोडणारी वीजवाहिनी वाहून गेली होती. ही तुटलेली वीजवाहिनी जोडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील नौका विभागाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश सांरग व सहायक पोलिस उपनिरीक्षक पोपट शिंदे या दोघांनी अर्जुना नदी पोहून पार करत बीजवाहिन्या पलीकडे नेल्या. त्यांच्या या कामगिरीचे राजापुरातून कौतुक होत आहे.
राजापूर तालुक्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे अर्जुना नदीला पूर आल्याने अर्जुना नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या शीळ, पावसकरवाडी व उन्हाळे मोडेवाडी या दोन गावांना जोडणारी विद्युतवाहिनी पुराच्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली होती. त्यामुळे दोन्ही गावातील बीजपुरवठा सुमारे ५ दिवस खंडित होता. ही वीजवाहिनी जोडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन नौका विभागाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. दोन्ही गावांना जोडणारी विद्युत वाहिनी दोरीला बांधून सारंग व शिंदे यांनी अर्जुना नदी पोहून पार करून दोन्ही गावांचा खंडित झालेला विद्युत प्रवाह जोडून देण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.
या कामी महावितरणचे अभियंता सनी पवार, वायरमन अक्षय भेरे, अभिनंदन सातोसे, लाईनमन मनोज पाटकर यांच्यासह राजापूर पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील येलके, राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सचिन बीर, राजापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत भोसले व त्यांचे सहकारी यांचेही सहकार्य लाभले. खंडित बीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रवाहामुळे बोट उतरवणे धोक्याचे
यावेळी नौका विभागाचे पोलिसउप निरीक्षक प्रकाश सारंग व त्यांचे सहकारी यांनी दोन्ही गावाची पाहणी केली असता अर्जुना नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे आपत्कालीन बोट अर्जुना नदीत उतरवणे धोक्याचे ठरणार होते. त्यामुळे त्यांनी अर्जुना नदी पोहून पार करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:32 15-07-2024
What's Your Reaction?