रत्नागिरी : स्पाईस व्हिलेजची निर्मिती करा : मंत्री दीपक केसरकर
रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी स्पाईस व्हिलेजची निर्मिती करावी आणि ठिकठिकाणी कासव महोत्सव घ्यावेत. तसेच खेकडा पालन, कोंबडी पालन, देशी गाईंची योजना, मधमाशी पालन याबाबत विविध विभागांनी एकत्र येऊन नियोजन करावे, असे निर्देश सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, मालगुंड येथील प्राणी संग्रहालयाच्या उभारणीबाबत लागणाऱ्या परवानगी केंद्र शासनाकडून घ्याव्यात. जिल्ह्यात येणाऱ्या हाऊस बोटींसाठी पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत. त्यामध्ये डेकवर खुर्चा, फ्लोटिंग जेट्टी यांचा समावेश करावा. चार खोल्या, एक उपाहारगृह याचे नियोजन केले पाहिजे. तीस किंवा चाळीस आसनी होड्या विकत घेऊन त्या बचतगटांना चालवायला दिल्या तर त्याचा फायदा होईल, स्पाईस व्हिलेज तयार करण्यासाठी गोवा येथे भेट देऊन पाहणी करावी. स्पाईस व्हिलेजमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागवून त्याबाबतची सबसिडी देणारी योजना तयार करावी. तसेच एक रेस्टॉरंट, किचन, होम स्टे कॉटेजचा समावेश असलेली वेगळी योजना तयार करा. कासव संवर्धन असणाऱ्या गावांमध्ये होम स्टे ची योजना करा. तसेच तिथे कासव महोत्सव सुरू करावेत. खेकडा पालन, कोंबडी पालन, दुधाळ जनावरे, देशी गाई पालन, मधमाशी पालन याबाबत लाभार्थी वाढविण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने सिंधुरत्न समृद्ध योजनेतून चार टुरिस्ट वाहने घेतली आहेत. त्यापैकी एका वाहनाची मंत्री केसरकर यांनी पाहणी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 13/Aug/2024
What's Your Reaction?