राजापुरात वयोश्री योजनेचे दीड हजारांहून अधिक अर्ज
राजापूर : मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचे दीड हजारांहून अधिक अर्ज पंचायत समितीला प्राप्त झाले आहेत. त्या अजाँची छाननी होऊन जिल्हा परिषदेला ४१८ अर्ज मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. उर्वरित अर्जाचे छाननीचे काम सुरू असल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली. छाननी होऊन परिपूर्ण पाठवण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास शासनाकडून तालुक्याला सुमारे १२ लाख ५४ हजार रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे.
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे. त्यात ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना एकरकमी तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टीकव्हील, चेअर फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, लंबर बेल्ट आदी वृद्धापकाळात सहाय्यक उपकरणे खरेदी करता येणार आहेत. लाभार्थीच्या वैयक्तीक आधार संलग्न असलेल्या बँकेच्या खात्यामध्ये या योजनेतील थेट लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत तालुक्याच्या ग्रामीण भागातून दीड हजाराहून अधिक अर्ज पंचायत समितीला प्राप्त झाले आहेत. अद्यापही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समितीकडे अर्ज येत असून, त्यातून लाभार्थी संख्या वाढणार असल्याचा अंदाज पंचायत समिती प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, आधारकार्ड व मतदान ओळखपत्राची छायांकित प्रत, उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा स्वयंघोषणा पत्र, सरकारच्या इतर योजना लाभ घेतला नसल्याचे घोषणापत्र,
लाभार्थी पात्रता निकष
अर्जदाराचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असावे
अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त नसावे
कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी वा आचकरदाता
नसावा
केवळ महाराष्ट्रातील कायम रहिवासी पात्र असतील
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 13/Aug/2024
What's Your Reaction?