छत्रपती शिवाजी महाराज अन् सावरकरांची तुलना कदापि होऊ शकत नाही; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Aug 31, 2024 - 11:15
 0
छत्रपती शिवाजी महाराज अन् सावरकरांची तुलना कदापि होऊ शकत नाही; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मुंबई : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत, मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो.

जे शिवछत्रपतींचा आदर करतात, त्यांना पूजतात, त्यांचीही मी माफी मागतो, असे त्यांनी म्हटले. आम्ही ते लोक नाही जे भारताचे सुपुत्र वीर सावरकरांचा अपमान करतो, आमच्यावर ते संस्कार नाही, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, मोदींना काळे झेंडे दाखवले, त्यांचा निषेध केला. मोदी गो बॅक अशा घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोटवर ज्या पद्धतीने कोसळला आणि जो संताप महाराष्ट्रात पसरला उसळला, तो मोदींनी पाहिला असेल. जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्राच्या संतापाला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे त्यांनी काल राजकीय माफी मागितली.

उद्या सरकारला जोडे मारणारच

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राबाबत प्रेम, आत्मीयता हे असण्याचे काही कारण नाही. माफी मागून प्रश्न सुटत असतील तर मागून टाकावी असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसत आहे. पण, या माफीमुळे प्रश्न सुटणार नाही.मोदींनी जरी माफी मागितली असेल तरी उद्यापासून राज्यभरात सरकारला जोडे मारायच्या आंदोलनाच्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही. उद्या महाविकास आघाडीचे लाखो कार्यकर्ते एकत्र येतील आणि सरकारला जोडे मारतील.

...तर पुलवामानंतरही माफी मागितली असती

ते पुढे म्हणाले की,पंतप्रधानांना खरोखर अशा घटनांचे गांभीर्य असतं तर पाच वर्षांपूर्वी पुलवामात आमच्या चाळीस जवानांची हत्या झाली तेव्हाही त्यांनी माफी मागितली असती. जम्मू-काश्मीरमध्ये आजही कश्मीरी पंडितांवर अत्याचार होत आहे. त्यांची माफी मागितली असती. महिलांवर अत्याचार होत आहेत. त्याबद्दल माफी मागितली असती. पण, प्रत्येक वेळेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करायची ही आमच्या पंतप्रधानांची खासियत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली हा तुमचा व्यक्तिगत विषय आहे. हा राजकीय विषय आहे. माफी मागितली तरी महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

आम्ही ते लोक नाही जे भारताचे सुपुत्र वीर सावरकरांचा अपमान करतो, आमच्यावर ते संस्कार नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली होती. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. म्हणून मी म्हणत आहे की, ही राजकीय माफी आहे. वीर सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना कदापि होऊ शकत नाही. सहा सोनेरी पाने हे सावरकरांचे पुस्तक आम्ही पंतप्रधानांना वाचायला पाठवू. काँग्रेसने काय करायचे हा काँग्रेसचा प्रश्न असेल. पण, वीर सावरकरांना अद्याप भारतरत्न देऊन सन्मानित का केले नाही? त्याबद्दल तुम्ही माफी मागावी, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 31-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow