रत्नागिरीला पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'
रत्नागिरी : गोव्याच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, अरबी समुद्रातील मोसमी पावसाची वाटचाल वेगाने सुरू झाली असताना गुरूवारी रात्री त्याने रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्हात जोरदार हजेरी लावली. दरम्यान, शनिवारपासून खऱ्या अर्थीने मोसमी पाऊस सक्रीय होणार असून मुंबईसह कोकण आणि पश्चिम घाटाच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये म्हणजे कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी मुसळधार पावसासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.
मोसमी पाऊस गुरुवारी दक्षिण कोकणात दाखल झाला. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मोसमी पावसाने गुरूवारी रात्री जोरदार ते मध्यम सरींनी हजेरी लावली. शुक्रवारी सकाळीही काही भागात हलक्या सरी झाल्या.
दरम्यान, शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यंदा मोसमी पाऊस नियोजित वेळेपेक्षा दोन दिवस आधीच आल्याचे सांगण्यात येते. गतवर्षी मोसमी पाऊस ११ जूनला दाखल झाला होता. या वर्षी ८ जूनला मोसमी पाऊस दाखल हाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. पाच वर्षांपूर्वी मोसमी पावसाचे आगमन तब्बल १५ दिवस लांबले होते तर २०२० मध्ये मोसमी पावसाचे आगमन सहा दिवस विलंबाने झाले होते. मात्र, २०२१ मध्ये मोसमी पावसाचे आगमन दोन दिवस आधीच झाले होते. २०२१ मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने पाऊस दोन दिवस आधीची दाखल झाला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 08-06-2024
What's Your Reaction?