अंशकालीन महिला परिचर आजपासून संपावर
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील १९६६ पासून सेवेत कार्यरत असलेल्या महिला परिचरांनी विविध मागण्यांसाठी १ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे. याची सुरुवात आझाद मैदान येथे आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १५० महिला सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष आकांक्षा कांबळे यांनी दिली.
गेली अनेक वर्ष या महिला विविध मागण्यांसाठी शासनाकडे संघर्ष करत आहेत. जानेवारी महिन्यात आझाद मैदानावर मोठ्या संख्येने एकत्रित येत आक्रोश आंदोलन केले होते. यावेळी शासनाने या मागण्या पूर्ण करण्याचाबत आश्वासन दिले होते. मात्र अद्याप याबाबत काहीच कार्यवाही पूर्ण झालेली नाही. यामुळे या महिला परिचरांनी पुन्हा शासनाविरोधात एल्गार पुकारला आहे.
किमान वेतन २१ हजार रुपये अंशकालीन महिला परिचर या देण्यात यावे. अंशकालीन नावात बदल करण्यात यावा, प्रसूती रजा मंजूर करावी, प्राथमिक आरोग्य केंद्रात १ पद ज्येष्ठतेनुसार परिचर पदावर देण्यात यावे. या प्रमुख मागण्या अंशकालीन महिला परिचरांच्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील अंशकालीन महिला परिचर या आंदोलनात सहभागी होणार आहेत. १ जुलैपासून बेमुदत संप असून राज्यातील तब्बल १० हजार ६७३ महिला परिचर मुंबई येथील आझाद मैदानावर एकत्र येणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील १५० महिला परिचर मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. अशी माहिती संघटनेच्या अध्यक्षा आकांक्षा कांबळे यांनी दिली.
आम्ही १९६६ मध्ये अवघ्या ५० रुपये मासिक मानधनावर काम करत होतो. आज अवघ्या तीन हजार पगारावर काम करत आहोत. हे वेतन अत्यल्प आहे. ग्रामीण दुर्गम भागात काम करणाऱ्या महिलांना किमान २१ हजार रुपये किमान वेतन मिळावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत शासनाकडून मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आमचं बेमुदत उपोषण सुरूच असणार आहे. आकांक्षा कांबळे, जिल्हाध्यक्ष, महिला परिचर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 01/Jul/2024
What's Your Reaction?