रत्नागिरी -गोवंश हत्या प्रकरण: आरोपीचा जामीन रद्दसाठी पोलिस अपील करणार
रत्नागिरी : गोवंशीय हत्येतील संशयित आरोपीचा जामीन रद्द व्हावा, यासाठी ग्रामीण पोलिस जिल्हा न्यायालयात अपील करण्याच्या विचारात आहे. सोमवारी न्यायालयात झालेल्या तारखेवेळी ग्रामीण पोलिसांनी त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली; परंतु जामीन का देऊ नये? याबाबत लेखी स्वरूपात पटलावर काहीच न दिल्याने न्यायालयाने आरोपी शादाब गनी बलबले याला जामीन मंजूर केला.
गोवंश हत्याप्रकरणी आरोपी शादाब बलबले याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याने वेतोशी येथे बेकायदेशीरपणे बांधून ठेवलेल्या गुरांसंदर्भातही ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यासंदर्भातसुद्धा अटकेची कारवाई होणार आहे.
गोहत्याप्रकरणी अटकेतील आरोपी शादाब बलबले याची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आरोपीला जामीन मिळवा, यासाठी अर्ज करण्यात आला होता. ग्रामीण पोलिसांनी त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयीन कोठडीचा अर्थ असा होतो की, पोलिस तपास संपला आहे. त्याचबरोबर त्याला का जामीन देऊ नये याबाबत ग्रामीण पोलिसांकडून न्यायालयाला लेखी म्हणणे सादर झाले नाही, त्यामुळे न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला. गोवंश हत्या हा गुन्हा गंभीर आणि तितकाच संवेदनशील आहे, त्यामुळे आरोपीचा जामीन रद्द व्हावा, यासाठी ग्रामीण पोलिस अपील करण्याचे नियोजन करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 17-07-2024
What's Your Reaction?