सौदी अरेबियातून रत्नागिरीतील पत्नीला ट्रिपल तलाक देणाऱ्या पतीवर गुन्हा
रत्नागिरी : सौदी अरेबियातून फोनवर रत्नागिरीतील पत्नीला ट्रिपल तलाख देणाऱ्या पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ जुलै २०२३ रोजी ५.३० ते १३ फेब्रुवारी २०२४ रोजी उद्यमनगर पटवर्धनवाडी येथे घडली आहे.
दिलावर अब्दुल रशिद साखरकर (४२, मुळ रा. लूलू दारुस सलाम अपार्टमेंट उद्यमनगर, रत्नागिरी सध्या रा. सौदी अरेबिया) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पत्नीने गुरुवार दि. २५ जुलै रोजी सायंकाळी ४.३३ वा. शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, दिलावर साखरकर याने २७ जुलै २०२३ रोजी पत्नीला फोन करुन तीन वेळा तलाक असे बोलून चुकीच्या पद्धतीने तसेच बेकायदेशीरपणे ट्रिपल तलाक दिला. त्यानंतर ५ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत त्याने पत्नीला तलाक दिल्याबाबतच्या नोटीस पाठवल्या. तसेच घरातील तिचे सामान आणि सोने घेऊन जाण्यास सांगितले.
या कालावधीत संशयित पतीने पत्नीचे कोणतेही म्हणणे एकून घेतले नाही, आपला पती आज ना उद्या रत्नागिरीत येईल तेव्हा एकमेकांसोबत समोरासमोर चर्चा करुन तो आपल्याला घरात घेईल या आशेवर पत्नी आपल्या माहेरीच रहात होती. परंतू असे काहीही न घडल्याने अखेर तिने शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी तक्रार दिली. तक्रारीवरुन पतीविरोधात मुस्लिम महिला विवाहाच्या अधिकारांचे संरक्षण कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 26/Jul/2024
What's Your Reaction?