रत्नागिरी : नोंदित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संचांचे वितरण

Aug 26, 2024 - 10:22
 0
रत्नागिरी : नोंदित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संचांचे वितरण

त्नागिरी : कामगार विभाग आणि महाराष्ट्र इमारत तसेच इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई (जिल्हा रत्नागिरी) यांच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील नोंदित बांधकाम कामगारांना रविवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम देसाई बॅंक्वेट येथे झाला.

यावेळी श्री. सामंत म्हणाले, शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेतल्यास प्रत्येकाची आर्थिक सुलभता होईल. शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. कामगार विभागाच्या २१ योजनांपैकी अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी वस्तू वाटप ही एक शासनाची योजना आहे. यामाध्यमातून एका नोंदित कामगाराच्या घरात २० हजार रुपयांच्या गृहोपयोगी वस्तू आणि सुरक्षा संच शासनाकडून मोफत देण्यात येत आहे. यातून आपली नक्कीच आर्थिक उन्नती होणार आहे.

समाजातील किंमत कष्टावर अवलंबून असते. कष्टाचे मोल व्हावे, तुमच्या घरामध्येदेखील गणपती सणाआधी अपेक्षित आर्थिक लाभ मिळावा, यासाठी तालुकानिहाय पहिल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार विभागामार्फत मुलांचे प्राथमिक शिक्षण ते लग्नापर्यंतच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाने आपल्या तालुक्याच्या ठिकाणी दरवर्षी नोंदणी करणे गरजेचे आहे. योजनामधून प्राथमिक शिक्षणासाठी २ हजार ५०० रुपये, आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ५ हजार रुपये, दहावी नंतरच्या शिक्षणासाठी २० हजार रुपये, अपघातात मृत्यू झाल्यास ५ लाख, नैसर्गिक मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये मिळतात. त्यामुळे कामगारांनी स्वत: नोंदणी करण्यासाठी तसेच इतरांना, आपल्या शेजाऱ्यांना नोंदणीबाबत सांगण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तालुकास्तरावरील एजन्सीने गावागावात जाऊन कामगारांच्या नोंदणी करुन घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.

संतोष आंबेकर, संभाजी चांदे आदींना यावेळी गृहोपयोगी वस्तू व सुरक्षा संचाचे प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. महेश अवसरे यांचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्याने महिमा अवसरे यांना सहाय्यता निधी म्हणून ५ लाखांचा धनादेश, सुधीर जाधव या नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याने सिद्धांत जाधव यांना २ लाखांचा धनादेश, संजय शंकर जाधव यांना नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहासाठी ५१ हजारांचा धनादेश, नोदणीकृत बांधकाम विवाहासाठी प्रथमेश सुरेश पांचाळ यांना ३० हजारांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे, माजी नगराध्यक्ष राहूल पंडित, माजी सभापती दिलीप सावंत, तहसीलदार राजाराम म्हात्रे, बिपीन बंदरकर, विनोद कदम, सुशांत जाधव, संजय जाधव, दिव्या गोताड आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 26-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow