आंबा हंगाम अंतिम टप्प्यात

Jun 1, 2024 - 09:53
Jun 1, 2024 - 10:08
 0
आंबा हंगाम अंतिम टप्प्यात

रत्नागिरी : जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसामुळे काही भागातील आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे; मात्र मागणी कायम असल्यामुळे दर अजूनही तेजीत आहेत. यंदा जिल्ह्यात मार्चपासून आंबा हंगाम सुरू झाला. पहिल्या टप्प्यात अतिशय कमी प्रमाणात आंबा बाजारपेठेत दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांत उत्पादन मोठ्या प्रमाणात आले. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काही भागांमध्ये तयार झालेला आंबा बाजारपेठेत आला. निम्मे फळ झाडावर असताना अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बागायतदारांनी नुकसानाच्या भीतीने तयार फळ बाजारात विक्रीसाठी आणले. त्यात कच्चे आंबेही विकण्यात आले. मागील पंधरा दिवसात आंब्याची मोठी उलाढाल झाली. तयार झालेले परंतु जमिनीवर पडलेले आंबे कॅनिंगसाठी पाठवण्यात आले. त्यामुळे आता विक्रेत्यांकडे अतिशय कमी प्रमाणात आंबा आहे. मात्र, आंब्याची मागणी ग्राहकांकडून कायम आहे. तयार झालेला आंबा बाजारात ४०० ते ६५० डझन या दराने विकला जात आहे. कच्चे आंबे दोन हजार रुपये शेकडा या दराने विकले जात आहेत. कच्च्या आंब्याला ग्राहकांकडून फार प्रतिसाद नाही. कारण, मागील पंधरा दिवस पाऊस झाल्यामुळे कच्चे आंबे तयार होईपर्यंत ते खराब होण्याची शक्यता आहे. या भीतीने विक्रेतेही कमी दरात कच्चे आंबे विकत आहेत; मात्र तयार आंबे ग्राहक घेण्यास प्राधान्य देत असल्यामुळे त्याचे दरही चढे आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 01/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow