मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर धामणीजवळ रस्ता खचण्याची भीती
![मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर धामणीजवळ रस्ता खचण्याची भीती](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202406/image_870x_666696d3bbab5.jpg)
संगमेश्वर : गेल्या १२ वर्षापेक्षा अधिक काळ ठेकेदार आणि प्रशासन यांनी कोकणवासियांचा अक्षरशः अंत पाहायचे ठरविले असून, दरवर्षी पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्गाचा प्रवास अधिकच खडतर बनत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरमधील धामणी येथे महामार्ग खचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी धामणे येथील नदीलगत मोठी संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. पावसाळा तोंडावर असताना हे काम हाती घेतल्याने सध्या ते अपूर्ण आहे. परिणामी, येथील रस्ता आता खचू लागला असल्याने वाहनांना धोका निर्माण झाला आहे.
संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने पावसामुळे रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी संरक्षण भिंतीचे काम जर पूर्ण होणार नव्हते तर ते हाती का घेतले? असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. धामणी येथे नदीलगत रस्ता रुंद करण्याच्या हेतूने नदीपात्राचा विचार न करता संरक्षण भिंत उभारण्याचे काम महिनाभरापूर्वी हाती घेण्यात आले. जर हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नव्हते तर येथील रस्ता का खोदून ठेवला, असा सवाल आता वाहनचालक उपस्थित करत आहेत, सद्य:स्थितीत या भिंतीचे काम २५ टक्के देखील पूर्ण झाले नसून, बाजूने खोदलेला रस्ता आता खचू लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंते हे काम सुरू झाला त्यावेळी उपस्थित नव्हते का? असा संतप्त सवाल वाहनचालकांनी विचारला आहे.
संरक्षण भिंतीचे काम पूर्ण होण्यास जर तीन महिन्यांचा कालावधी लागणार होता तर पावसापूर्वी महिनाभर हे काम हाती घेऊन महामार्गास धोका उत्पन्न करणाऱ्या ठेकेदार कंपनीसह कामावर नियुक्त अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. धामणी येथे ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे त्या ठिकाणी मातीचे छोटे-छोटे ढिगारे ओतून ठेवण्यात आले असून, यामुळे वाहनांची सुरक्षा होणार आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
पावसाला सुरुवात झाल्यानंतर धामणी ते बावनदी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळ्यापूर्वी डायव्हर्शन आणि अन्य ठिकाणी ठेकेदार कंपनीने डांबरीकरण न केल्याने बांधकाममंत्र्यांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी परशुराम पवार यांनी केली आहे. महामार्गावर पहिल्याच पावसानंतर डोंगराची माती येऊन चिखल होण्यास सुरुवात झाली आहे.
डिझेलचा तुटवडा धामणी येथील रेल्वे ओव्हरब्रीजच्या जवळ महामार्ग धोकादायक बनला आहे. सध्या डिझेलचा तुटवडा असल्याने काम बंद असल्याची माहिती महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रस्ता खचल्यास महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी पर्यायी रस्ता नसल्याने महामार्ग बंद होऊन वाहतुक पूर्णतः ठप्प होण्याची भीती आहे. अशी स्थिती असताना ठेकेदार कंपनीकडे डिझेल नसल्याने कामाला गती मिळत नसल्याचे विधान ह्यस्यास्पद असल्याचे मत परशुराम पवार यांनी व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 10/Jun/2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)