खेड तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित
खेड : तालुक्यात यंदा मॉन्सूनने वेळेत हजेरी लावली आहे; पण पहिल्याच पावसात महावितरणचा कारभार विस्कळीत झाला. पाऊस सुरू झाल्यापासून शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा व्यापाऱ्यांना फटका बसत आहे.
महावितरणने मॉन्सूनपूर्व कामांसाठी वीजपुरवठा खंडित करत देखभालीची कामेदेखील पूर्ण केल्याचा दावा केला आहे. गेल्या आठवडाभरापासून तालुक्यात पर्जन्यवृष्टी सुरू आहे; मात्र पहिल्याच पावसात महावितरणचा गोंधळाचा कारभार समोर आला आहे. कोणत्याही क्षणी खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची छोट्या व्यावसायिकांना झळ बसत आहे. दिवसातून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने दुग्धजन्य विक्रेते, आईस्क्रीम व खाद्यपदार्थांचे विक्रेते यांच्यासह झेरॉक्स दुकान व्यावसायिकांनाही याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
याशिवाय इतर व्यावसायिकही हवालदिल झाले आहेत. एकीकडे वीजबिल भरणा न केल्यास महावितरणकडून तातडीने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते; त्यामुळे ग्राहक मेटाकुटीस आलेले आहेत. त्यात सुसूत्रता आणण्यासाठी महावितरणकडून कार्यवाही केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 21/Jun/2024
What's Your Reaction?