राजापूर : दांडे - अणसुरे पुल १५ दिवसात वाहतूकीस खुला होण्याची शक्यता

Jun 17, 2024 - 15:22
Jun 17, 2024 - 15:25
 0
राजापूर : दांडे - अणसुरे पुल १५ दिवसात वाहतूकीस खुला होण्याची शक्यता

राजापूर : सागरी महामार्गावरील सिंधुदुर्ग-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील दांडे- अणसुरे पुलाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लागावे आणि होणारी जनतेची गैरसोय दूर व्हावी, यासाठी सिधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. येत्या पंधरा दिवसांत हे काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी दिली आहे.

या पावसाळ्यात या पुलावरून सुरळीत वाहतूक सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून, हे काम वेळीच पूर्ण व्हावे, यासाठी सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाठपुरावा करत होतो. आता हे काम अंतिम टप्यात आले असून, येत्या पंधरा दिवसात हा पूल वाहतुकीस खुला होईल, असा विश्वास नागले यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जनतेची होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे नागले यांनी सांगितले.

सागरी महामार्गावरील सिंधुदुर्ग-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील दांडे अणसुरे पुलाच्या दुरुस्तीचे काम गेले वर्षभर अत्यंत संथगतीने सुरू आहे. हे काम पावसाळयापूर्वी पूर्ण होऊन वाहतूक सुरू होईल, असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने किरण सामंत यांनी प्रशासनाला सूचना केल्या होत्या. पुलाअभावी स्थानिक जनतेची होणारी गैरसोय दूर व्हावी, यासाठी किरण सामंत यांनी पर्यायी व्यवस्था केली होती.

या पुलाच्या दुरुस्तीचे काम १० कोटी रुपये खर्चुन
घारपुरे कन्स्ट्रक्शन ही कंपनी करीत आहेत. मूळ पुलाच्या जागी असलेला भराव हटवून १ पिलर वाढवून पुलाची लांबी वाढविली आहे. यासाठी अपेक्षित कालावधी तीन महिन्यांचा असताना आता वर्षभराचा कालावधी लोटला, तरी पूल वाहतुकीसाठी सुरू न झाल्याने दोन्हीही जिल्ह्यांतील वाहनचालक व जनतेला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. आता हे काम अंतिम टप्यात आले असून, पावसाळ्यात हा पूल वाहतुकीस खुला होऊन होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे नागले यांनी सांगितले. यावेळी रमेश काजवे, महिला उपतालुकाप्रमुख सिद्धी शिरसेकर, शाखाप्रमुख संदीप कदम, संतोष लिंगायत, संतोष जैतापकर, अमोल कांबळी, राहुल आंबोळकर आदी उपस्थित होते.

पाच वर्षांतच पूल नादुरुस्त
सागरी महामार्गावरील सिंधुदुर्ग-त्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील दांडे-अणसुरे पूल बांधल्यापासून पाच वर्षांतच नादुरुस्त झाला होता. दडि अणसुरे बाजूकडील पुलाचा काही भाग खचल्यामुळे तो धोकादायक झाला होता. त्यामुळे गतवर्षी मार्च महिन्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:49 PM 17/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow